जागर बोलीचा : चंद्रपूर 2026
आयोजक संस्था- श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव जिल्हा चंद्रपूर.
अहवाल
कुरमारी, कोलामी आणि परधानी बोली.
मराठी भाषा विभाग तथा भाषा संचलनालय महाराष्ट्र राज्य गोंडवाना विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग आणि मराठी विभाग श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव जिल्हा चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागर बोलीचा हा विशेष कार्यक्रम नवरगाव येथे दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला. या जागर बोलीचा या कार्यक्रमात तीन बोलींचा सन्मान करण्यात आला. कुरमारी, परधानी आणि कोलामी या बोलींच्या अभ्यासपूर्ण मांडणी सोबत सकाळी ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा, त्या त्या बोलीतील भाषक समाजातील काही निवेदकांशी संवाद, त्या बोलीतील लोकसंस्कृतीचे दर्शन होईल असे सादरीकरण आणि त्या बोलीच्या अभ्यासकांची अभ्यासपूर्ण मांडणी अशा स्वरूपाच्या विविध सत्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवरगाव तसे झाडीपट्टीतील नाट्य पंढरी मानले जाते. नवरगावच्या श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी विभागाने मागील एक महिन्यापासून तयारी करून प्रस्तुत जागर बोलीच्या कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर असे आयोजन केले. त्या त्या बोलीच्या अभ्यासकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून शोधनिबंध लिहून घेण्यात आले. प्रत्यक्ष जागर बोलीच्या कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी ठीक नऊ वाजता महाविद्यालयाच्या परिसरातून ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रत्नापूर फाटा, आझाद चौक, हनुमान मंदिर रोड ते गांधी चौकातून दुकान लाईन मधून परत महाविद्यालयात या शोभा यात्रेचे विसर्जन करण्यात आले. महाविद्यालय परिसरात शोभायात्रा आल्यानंतर सर्वप्रथम नवरगाव परिसरात वास्तव्यास असणारे मेंढी पालन करणारे, भाषिक आणि सांस्कृतिक दृष्टीने मराठी संस्कृतीशी भिन्नता दर्शविणारे कुरमार समुदायातील महिला त्यांची स्त्री गीते सादर केली. बदकम्मा हा त्यांचा नवरात्र उत्सवातील महिलांचा महत्त्वाचा सण. त्या सणांची गाणी आणि गौरीची गाणी महिलांनी अत्यंत पारंपारिक वेशभूषा सादर करून महाविद्यालयाच्या परिसरात गोल फेर धरून सादर केले. त्यानंतर कोलामी महिला एकमेकाचे दंड पकडून फेर धरत आपली पारंपारिक गाणी सादर करीत नृत्य केले. पारंपरिक वेशभूषा धारण करून परधानी लोकसमुदायातील पारंपारिक नृत्य परधानी समुदायाने सादर केले. दीड तास चाललेल्या या शोभा यात्रेनंतर सर्व बोलीतील पारंपारिक गाणी आणि नृत्य सादर झाले. नंतर जागर बोलीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन पसायदान सभागृहात संपन्न झाले. आयोजकांकडे भाषा तज्ञांनी आपले शोधनिबंध सादर केले. उद्घाटनानंतर संवाद आणि भाषा तज्ञांची मांडणी असे कार्यक्रम नियोजित होते. उद्घाटन सत्रात डॉ सविता गोविंदवार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून बोली संवर्धनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषा संचालनायाचे अभयराजे कुलकर्णी यांनी केले. तर संपूर्ण पाहुण्यांचा परिचय डॉ गजानन कोर्तलवार यांनी करून दिला. मध्यंतरी मुंबई येथून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची घोषणा झाली. महाराष्ट्रात तीन दिवसाचा दुःखटा जाहीर झाला. त्यामुळे प्रस्तुत कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून रद्द करण्यात आला. नियोजित संवाद, भाषा तज्ञांची मांडणी हे दोन कार्यक्रम दुःखवटा संपल्या नंतर आयोजित करण्याचे ठरले. भाषा तज्ञांनी आणलेले त्यांच्या बोलीवरील लेख तथा कार्यक्रमाचा संपूर्ण अहवाल भाषा संचालनाकडे सादर करण्यात आला.